सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २०१ ते २१३
सार्थ ज्ञानेश्वरी
🌼 अध्याय २ रा
🏹 ओवी २०१ ते२१३
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖👇➖➖➖
🌻अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते॥ ३४॥
अर्थ 👉 सर्व लोक तुझी सर्वकाल अपकीर्ती सांगत राहातील आणि संभावित पुरुषाला तर अपकीर्ती मरणापेक्षा जास्त वाईट आहे. ॥३४॥
➖➖➖➖👆➖➖➖
🌷म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील।आणि अपेश तें न वचेल ।कल्पांतावरी॥ २०१ ॥
✏ एवढ्याच करीता अर्जुना, पुन्हा ऐक, जर या प्राप्त प्रसंगी तू आपल्या क्षत्रियधर्माचे पालन केले नाहीस; तर पाप लागेल आणि कल्पांतपर्यंत अपकीर्तीचा डाग नाहीसा होणार नाही.
🌷जाणतेनि तंवचि जियावे ।जंव अपकीर्ति आंगा न पवे।आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां॥ २०२॥
✏ जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही, तोपर्यंतच व्यवहारी आणि सज्जनांनी जगावे; असे असताना, मग अपकीर्ती सोबत घेऊन इथूनच (युद्ध न करता) मागे फिरावे का?
🌷तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता। परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥२०३॥
✏ आणि जरी तू मत्सररहित दयायुक्त अंतःकरणाने माघारी फिरलास; तरी या सर्वाना ही गोष्ट अथवा तुझी ही स्थिती मुळीच पटणार नाही,
🌷हें चहूंकडून वेढितील ।बाणवरी घेतील।तेथ पार्था न सुटिजेल।कृपाळुपणे ॥२०४॥
✏ हे कौरव तुला चोहोकडून घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. मग पार्था, तुझा हा कनवाळूपणा यातून तुझी सुटका करणार नाही.
🌷ऐसेनिही प्राणसंकटे।जरी विपायें पां निघणें घटे।तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥२०५॥
✏ आणि जरी मोठ्या कष्टाने या प्राणसंकटातून तुझी सुटकाही झाली, तरी अर्जुना, तरी ते तसे जगणे मरणापेक्षा वाईटच आहे.
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌻भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः ।येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्॥३५॥
अर्थ 👉 महारथी, भयामुळे तू रणातून परत गेलास असे तुला मानतील. ज्यांना तुझ्याविषयी बहुमान वाटत होता, त्यांच्या दृष्टीने तू कमीपणाला जाशील.
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷तूं आणिकही एक न विचारिसी ।एथ संभ्रमे झुंजो आलासी।आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी॥२०६॥
✏ आणखीन एक विचार कर की, तू या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेने लढण्यासाठी आलास. आणि दया उत्पन्न झाल्याने परत माघारी जाण्यासाठी फिरलास.
🌷तरी तुझें तें अर्जुना।या वैरियां दुर्जनां|कां प्रत्यया येईल मना ।सांगे मज ॥२०७॥
✏ तर अर्जुना! हे दयाळूपण, तुझे हे दूर्जन वैरी कौरव, यांच्या मनाला खरे वाटेल का?
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌻अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः।निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम्॥३६॥
अर्थ 👉 तुझे शत्रू बोलण्याला अयोग्य अशी पुष्कळ भाषणे बोलतील. आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील. यापेक्षा अधिक दु:खदायक ते काय आहे ? ॥२-३६॥
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला।हा सांगें बोलु उरला । निका कायी॥२०८॥
✏ हे तर म्हणतील की, "गेला रे गेला ! अर्जुन आम्हाला भिऊन पळून गेला." असा हा लोकांचा बोल तुझ्यावर येईल तो बरा आहे का.
🌷लोक सायासें करूनि बहुतें ।कां वेंचिती आपुली जीवितें।परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा॥२०९
✏ अर्जुना ! लोक आपली कीर्ती व्हावी, वाढावी म्हणून काय काय करतात प्रसंगी आपला जीव देतात पण आपली कीर्ती वाढवतात.
🌷ते तुज अनायसें ।अनकळित जोडिली असे।हें अद्वितीय जैसें । गगन आहे॥२१०॥
✏ आणि स्वतःची कीर्ती वाढविण्याची सुवर्णसंधी (हे युद्ध) अनायासे तुझ्याकडे चालून आली आहे.
🌷तैसी कीर्ती निःसीम।तुझां ठायीं निरुपम।तुझे गुण उत्तम।तिहीं लोकीं ॥२११॥
✏ तशी ही अमर्याद उपमारहित कीर्ती तुझ्या ठिकाणी आहे व तुझे गुणही उत्तम आहेत तशी तुझी त्रिलोकात ख्याती आहे.
🌷दिगंतीचे भूपति।भाट होऊनि वाखाणिती। जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥२१२॥
✏ देशदेशांतरीचे राजे रजवाडे, स्तुतीपाठक होऊन तुझीच गुणकीर्ती गातात. ती ऐकून यमादिक देखील तुला भितात!
🌷ऐसा महिमा घनवट ।गंगा तैसी चोखट। जयां देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥२१३॥
✏ असा हा तुझ्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे. आणि तो पाहून व ऐकून जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याची प्रेरणा मिळते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा