सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२
ना तरी शब्दब्रह्माब्धि। मथिलेया व्यासबुद्धि । निवडिले निरवधि । नवनीत हे।।५१॥
✏ माऊली म्हणतात की अशी कल्पना करा की व्यास ऋषींनी (चार वेद) ज्ञानरूपी शब्दांचा समुद्र बूद्धीरूपी रवीने घुसळून महाभारत रूपी लोणी बाहेर काढले आहे.
🌷मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेके । पद आले परिपाकें । आनंदाची॥५२॥
✏ नंतर त्या लोण्याला ज्ञानरूपी अग्नीच्या आचेवर विचाररूप कढ आला आणि पद्यरूपी साजूक तूप तयार झाले तीच ही गीता.
🌷जे अपेक्षिजे विरक्ति । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावे पारंगती । रमिजे जेथ॥ ५३॥
✏ ज्या गीतेची विरक्त लोक, इच्छा धरतात, संत तिचा अनुभव घेतात आणि ब्रह्मनिष्ठ जन तिचे ठिकाणी रममाण होतात.
🌷जे आकर्णिजे भक्ती । जें आदिवंद्य त्रिजगतीं । ते भीष्मपर्वीं संगती । सांगीजैल॥ ५४॥
✏ ही कथा त्रिजगती ऐकण्यास योग्य परमपूज्य आहे.
🌷जें भगवद्गीता म्हणीजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे। जे सनकादिकीं सेविजे । आदरेसीं॥५५॥
✏ या कथेला भगवतगीता म्हणतात आणि ब्रह्म व शंकर तिची स्तुती करतात. सनकादिक संत अतीव आदराने तिचे श्रवण पठण करतात.
🌷जैसे शारदियेचे चंद्रकळे- । माजीं अमृतकण कोंवळे । तें वेंचती मवाळें । चकोरतलगें॥५६॥
✏ ज्याप्रमाणे शरदऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील अमृत कण चकोर पक्ष्यांची पिले हळुवार मनाने प्राशन करतात.
🌷तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।अति हळुवारपणे चित्ता|आणूनियां५७॥
✏ त्या पक्ष्यांप्रमाणे श्रोत्यांनी ही कथा (वाचावी असे नाही तर) अनुभवावी. मनातील चंचलता काढून, मन विक्षेपरहित करून कुशाग्रबुद्धीने या भगवद् गीतेचा अनुभव घ्या.
🌷हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणता भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८॥
✏ गीतेचे केवळ शब्दोच्चार न करता, मनन करावे. इंद्रियांना न कळता अनुभव घ्या आणि प्रतिपाद्य विषय समजून घ्या आणि मगच त्या विषयावर व्याख्यान अगर चर्चा करा.
🌷जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥५९॥
✏ भ्रमर कमळातील पराग (मध) हळूवारपणे नेतात. पाकळ्यांना ते समजत ही नाही त्याप्रमाणे ग्रंथ श्रवणाची पद्धती आहे .
🌷का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे चंद्रु प्रकटता । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥६०॥
✏ किंवा चंद्र प्रगटण्यापूर्वीच चंद्रविकासिनी कमलिनी उमलून आपले स्थान न सोडता चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे प्रेमसौख्य तिचे तीच जाणते.
🌷ऐसेनि गंभीरपणे । स्थिरावलेनि अंत:करणे । आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥ ६१॥
✏ अशा प्रकारे शम दम शुद्ध अंतकरणाने संपन्न असेल तोच गीतेतील विषयाचे रहस्य जाणून घेवू शकतो.
🌷अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करून संतीं । अवधान द्यावे ॥ ६२॥
✏ अर्जुना सारखी श्रवण क्षमता असलेल्या संतांनी कृपा करून लक्ष देऊन ऐकावे.
.png)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा