सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी १ ते २०
अध्याय दुसरा
🌼 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🌸 ||सांख्य योग||
🌼 ओवी १ ते २०
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🔔संजय उवाच : तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम्। विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥
अर्थ 👉 संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले. ॥२-१॥
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🐚मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें। शोकाकुल रुदनातें । करितुसे॥ १॥
✏ मग संजय धृतराष्ट्र रायास म्हणतो, महाराज अर्जुन त्याठिकाणी शोकाने व्याकुळ होऊन रडू लागला.
🐚तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।तेणें द्रवले असे चित्त ।कवणेपरी ॥ २ ॥
✏ आपले सर्व कूळ पाहून; त्याच्या मनात विलक्षण मोह उत्पन्न झाला. आणि त्यायोगे त्याचे चित्त द्रवले.
🐚जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें॥ ३॥
✏ जसे पाण्यात मीठ विरघळते किंवा वार्याने ढग नाहीसे होतात त्याप्रमाणे अर्जुन धैर्यशील असूनही त्याचे ह्रदय द्रवीभूत झाले.
🐚म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
✏ जसा राजहंस पक्षी चिखलात गुंतला की म्लान होतो तसा अर्जुन ममतेने व्याकुळ होऊन अगदी कोमेजून गेला आहे.
🐚तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरू |देखोनि शार्गङधरु । काय बोले॥ ५ ॥
✏ अर्जुन मोहाने असा ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण त्यास काय म्हणतात. .........
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🔔श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन॥२॥
अर्थ 👉 भगवान म्हणाले हे अर्जुना, आर्यांनी सेवन करण्यास अयोग्य, स्वर्गप्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा मूर्खपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला ?॥२-२॥
➖➖➖➖⛳➖➖➖➖
🐚म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं। तूं कवण हें कायी । करीत आहासी॥ ६ ॥
✏ अरे अर्जुना, तू हे पहा की तू कोण आहेस? तू काय करतो आहेस? याचा आधी विचार करावा; या युद्धप्रसंगी तुला युद्ध सोडून जाणे शोभते का ?
🐚तुज सांगे काय जाहलें । कवण उणे आलें। करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
✏ तुला काय झालं? काय कमी पडले? तुझे काय करायचे राहिले? म्हणून तू दुःख करीत आहेस ?
🐚तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी।तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे॥ ८ ॥
✏ तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. धीर सोडू नकोस. अर्जुना तुझ्या फक्त नावालाच अपयश भीत आहे. अपयश भिऊन पळून जाते .
🐚तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं॥ ९ ॥
✏ तू शूरवृत्तीचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा तू राजा आहेस. आणि तुझ्या शौर्याचा तर तिन्ही लोकांत डंका वाजत आहे.
🐚तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला।पवाडा तुवां केला । गंधर्वासी॥ १० ॥
✏ तू युद्धात श्रीशंकराला जिंकले आहेस. निवांत कवचाचा उच्छेद केलास. आणि गण गंधर्व तुझ्या पराक्रमाचे पवाडे गात आहेत.
🐚हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें।ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥ ११ ॥
✏ तुझ्या पराक्रमाची तुलना त्रैलोक्यात कुणाशीही होऊ शकत नाही. असे तुझे पौरूषत्व असताना;
🐚तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें।अधोमुख रुदनातें । करितु आहासी॥ १२ ॥
✏ असा तू आज रणांगणात वीरवृत्ती सोडून खाली तोंड करून रडतो आहेस.
🐚विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु।सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी॥ १३ ॥
✏ अर्जुना, तुला करूणेने इतके ग्रासावे??? इतके दीन करावे? अरे, अंधाराने सूर्याला कधी गिळले आहे का?
🐚ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें॥ १४ ॥
✏ अर्जुना, वारा कधी मेघाला भितो का? अमृताला कधी मरण आहे का ? किंवा लाकडाने कधी अग्नी गिळला आहे का? सांग बरे.
🐚की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे। सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी॥ १५ ॥
✏ मिठाने पाणी कधी विरले आहे का? अथवा काळकूट वीष दूसर्याच्या संसर्गाने मेले आहे का? किंवा मोठ्या सापास बेडकाने कधी गिळले आहे का?
🐚सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला।परी तो त्वां साच केला । आजि एथ॥१६॥
✏ सिंहासी कधी कोल्ह्यांनी झोंबी केली आहे का? अशा अशक्य गोष्टी कधी घडतात का? अर्जुना, पण तू हे सर्व इथे शक्य होतात हे दाखवून दिलेस.
🐚म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥ १७ ॥
✏ म्हणून अर्जुना तू या मोहास तुझ्या चित्तात अजिबात थारा देऊ नकोस, मनाला धीर दे आणि सावध हो.
🐚सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण। संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे॥१८॥
✏ आता हा वेडेपणा सोड, हातात धनुष्यबाण घे, कारण या रणभूमीवर तुझ्या करुणेचा काहीही उपयोग नाही.
🐚हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।सांगे झुंजावेळें सदयता ।उचित कायी॥ १९ ॥
✏ अर्जूना, तू जाणकार आहेस. युद्धप्रसंगी क्षत्रिया कारुण्य (दया करणे हा गुण) योग्य आहे का?
🐚हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २०॥
✏ श्रीकृष्ण अर्जुनास समजावितात की अर्जुना, हे तुझे वागणे आजपर्यंत संपादित केलेल्या कीर्तीचा नाश करणारे व परलोक प्राप्तीस अडथळा आणणारे असे आहे .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा