सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओवी १११ते १२४
अध्याय पहिला
🔔 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
🐚 ॥अर्जुनविषादयोग॥
🔔 ओवी १११ते १२४
⛳⛳⛳🌈🌞🌈⛳⛳⛳
🔔पतिव्रतेचे हृदय जैसे । पतीवांचूनि न स्पर्शे।मी सर्वस्व या तैसे । सुभटांसी॥१११॥
✏ ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या ह्रदयात तिच्या पतीशिवाय इतरांना किंचितही स्थान नाही. तसाच ( इतर कौरवांच्या बाजूच्या वीरांसाठी दुर्योधन) मी या योद्ध्यांसाठी आहे. त्यांचे सर्वस्व माझ्याशी जोडलेले आहे.
🔔आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें ।ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त॥११२॥
✏ माझ्यासाठी (कामासाठी) हे आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. आपले प्राण तुच्छ समजतात. म्हणून ते उत्तम असे स्वामीभक्त आहेत.
🔔झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती।हे बहु असो क्षात्रनीती । एथोनियां॥११३॥
✏ हे युद्धकले मध्ये निष्णात असून या कलेनेच कीर्तीला जिंकणारे आहेत. खरे तर यांच्यासारख्या वीरांमुळेच क्षत्रियधर्म प्रसिद्धीस आला.
🔔ऐसें सर्वापरी पुरते।वीर दळी आमुतें।आतां काय गणूं यांतें ।अपार हे॥११४॥
✏ याप्रमाणे आमच्या सैन्यातील अपार वीर पराक्रमी आहेत त्यांची मोजदादच करणे नको.
🔰🌼🔰🌼🔰🌼🔰🌼🔰
🌻अपर्याप्तं तदस्माकं बलं|भीष्माभिरक्षितम्।पर्याप्तं त्विदमेषां बलं|भीमाभिरक्षितम्॥ १०॥
अर्थ 👉 ते हे आमचे भीष्मांनी सर्व बाजूंनी (सेनापति होऊन) रक्षण केलेले सैन्य अजिंक्य आहे, पण त्यांचे त्या (दांडग्या) भीमाने सर्व बाजूंनी रक्षण केलेले सैन्य क्षुद्र (जिंकण्यास सोपे) आहे. ॥१-१०॥
🔰🌼🔰🌼🔰🌼🔰🌼🔰
🔔वरी क्षत्रीयांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी गा सुभटु। तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं॥११५॥
✏ त्यातच सर्व क्षत्रियात श्रेष्ठ आणि जगातील सर्व योद्ध्यांत प्रतापी ज्येष्ठ असे हे भीष्माचार्य. यांच्याकडे सैन्याचे नेतृत्व आहे.
🔔आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसे पन्नासीलें।येणे पाडे थेंकुले । लोकप्रिय ११६॥
✏ यांच्याच बळावर या सैन्याची व्यूहरचना किल्ल्याप्रमाणे बनविली आहे. ज्यांच्यापुढे हे त्रैलोक्य कमी आहे.
🔔आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपणा कवणा नाहीं॥ मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा॥११७॥
✏ जसे समुद्र आधीच सर्वांना दुस्तर आणि त्यात त्यास अग्नीचे सहाय्य लाभावे. किंवा प्रलयकारी मोठ्या अग्नीला सोसाट्याचा वारा साथीदार झाला तर त्यास कोण आवर घालील?
🔔ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु ।तैसा हा गंगासुतु । सेनापति॥११८॥
✏ त्याप्रमाणे भीष्माचार्य या प्रलयकारी सैन्याचे सेनापती असल्याने आता कौरव सैन्याला कोण आवरणार __ दुर्योधन
🔔आतां येणेंसि कवण भिडे । हे पांडव सैन्य कीर थोडें।ओइचलेनि पाडे । दिसत असे॥११९॥
✏ अशा माझ्या सैन्याशी हे पांडव सैन्य कसे लढणार ? कारण त्यांचे सैन्य कमी आहे. पण त्यांची व्यूह रचना वरपांगी मोठी दिसते.
🔔वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली असे॥१२०॥
✏ शिवाय पांडवसैन्याचे सेनापती पद भीमाकडे आहे. हे सांगून दुर्योधन स्तब्ध झाला.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🌻अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः|भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि॥११॥
अर्थ 👉 युद्धाच्या प्रवेशद्वारात आपापल्या नेमलेल्या ठिकाणी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्मांचेच सर्व बाजूंनी रक्षण करा. ॥१-११॥
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
🔔मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितलें।आता दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१॥
✏ मग सर्व सेनापतींना दुर्योधन म्हणाला " अहो आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा."
🔔जिया जिया अक्षौहिणी । तिये तिये आरणी ।वरगण कवणकवणी । महारथिया॥१२२॥
✏ ज्यांच्या ताब्यात सैन्याची अक्षौहिणी आहेत, त्यांनी सैन्य वाटून घेऊन युद्धस्थानी उभे रहावे.
🔔तेणे तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिले |द्रोणाते म्हणिजे । तुम्हीं सकळ॥१२३॥
✏ आपल्या अक्षौहिणी आपल्या नियंत्रणात ठेवून आपण भीष्माचार्यांच्या आज्ञेत रहावे. आणि द्रोणाचार्य आपण सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी.
🔔हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।येणें दळभारु आघवा । साचु आमुचा१२४॥
✏ आणि (गुरू महाराज) द्रोणाचार्य आपण भीष्मांचे रक्षण करावे. ते म्हणजे मीच आहे असे समजून त्यांची काळजी घ्यावी. कारण त्यांच्यावरच आपली भिस्त आहे.
सारांश == संजय हे युद्धभूमीवरील संवाद ऐकून राजा धृतराष्ट्राला सांगत आहे. त्यामूळे दुर्योधनाच्या बाजूने बोलावे लागते. राजाच्या विरोधात बोलायचे नाही आणि धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम तो जाणत होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा