सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी १९१ ते २००
अध्याय दुसरा
💙 सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या
💟 ||सांख्य योग||
💞 ओवी १९१ते२००
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
➖➖➖➖👇➖➖➖➖
🌻यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम्।सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥३२॥
अर्थ 👉 पार्था, अशा प्रकारचे युद्ध म्हणजे सहजगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार प्राप्त झाले आहे. ते भाग्यशाली क्षत्रियांनाच प्राप्त होते.
➖➖➖➖👆➖➖➖➖
🌷अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे ।कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे॥१९१ ॥
✏ अर्जुना, हे युद्ध म्हणजे तुम्हा क्षत्रियासाठी तुमचा पूर्वजन्मीचा भाग्योदय झाला असेच समज. अथवा सर्व धर्माचा ठेवा उघड झाला आहे.
🌷हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें।मूर्त कां प्रतापे । उदो केला ॥१९२॥
✏ हा तर तुमच्या मूर्तीमंत प्रतापाने स्वर्गच, युद्ध रूपाने तुमच्यापुढे उभा केला आहे.
🌷ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें।हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥ १९३ ॥
✏ किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझ्यावर अतिशय आसक्त होवून कीर्तीरूप स्त्रीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास (लग्न करण्यास) आली आहे .
🌷क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी॥१९४॥
✏ अर्जुना! असल्या प्रकारचे युद्ध क्षत्रियाला सहज प्राप्त होणारे नाही. कारण क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याच्या जीवनात असा युद्धप्रसंग प्राप्त होतो. जसे सहज रस्त्याने जाताना इच्छित फळ देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा.
🌷ना तरी जांभया पसरे मुख।तेथ अवचटें पडे पीयूख।तैसा संग्रामु हा देख ।पातला असे॥१९५॥
✏ किंवा जांभई देण्यासाठी सहज तोंड उघडावे आणि अचानक अमृत येऊन तोंडात पडावे. तसाच हा युद्ध प्रसंग अनायासे तुम्हाला चालून आला आहे.
➖➖➖➖👇➖➖➖➖
🍀अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि।ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं॥३३॥
अर्थ 👉 असे असून हा कर्तव्यप्राप्त संग्राम तू करणार नाहीस, तर स्वधर्म व कीर्ती टाकल्यामुळे पाप मात्र मिळवशील.
➖➖➖👆➖➖➖➖
🌷आतां हा ऐसा अव्हेरिजे ।मग नाथिले शोचूं बैसिजे ।तरी आपण आहाणा होईजे।आपणपेयां॥१९६॥
✏ आणि आता तू हा रणसंग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास; तर तू आपणच आपली हानी करून घेतली असे होईल.
🌷पूर्वजांचे जोडलें।आपणचि होय धाडिलें।जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये ॥१९७॥
✏ ह्या रणांगणावर तू अशी शस्त्रे टाकलीस; तर तुझीच नाही, तर तुझ्या पूर्वजांनीही जोडलेली पुण्यकीर्ती तू घालविलीस, असे होईल.
🌷असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल।आणि गिंवसित पावतील ।महादोष॥१९८॥
✏ तुझी कीर्ती तर जाईलच; पण सर्व जग निंदाही करेल आणि अनेक मोठाले दोष तुला येऊन गाठतील.
🌷जैसी भ्रतारेहीन वनिता।उपहृती पावे सर्वथा ।तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण॥१९९॥
✏ ज्याप्रमाणे पतीविरहीत स्त्री सर्वतोपरी तिरस्करणीय होते
(त्या काळात माऊलींनी लिहिले असेल असेल; पण आज या काळात अनेक माताभगिनींनी स्वकर्तृत्वाने पुरूषांना लाजविल असा आपला आणि आपल्या अपत्यांचा सांभाळ केलेला दिसतो. असो कालपरत्वे ओव्यांचे योग्य अर्थ आपण घेऊया.) तसे स्वधर्माचे आचरण न केल्याने (स्वधर्माचा त्याग केल्याने ) जीवाची दशा होते.
🌷ना तरी रणीं शव सांडिजे।तें चौमेरीं गिधीं विदारिजे ।तैसे स्वधर्महीन अभिभविजे ।महादोषी॥२००॥
✏ किंवा रणात प्रेत पडले म्हणजे ज्याप्रमाणे चोहोकडून गिधाडे त्याला फाडतात. त्याप्रमाणे स्वधर्महीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा