सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ||सांख्य योग||

ज्ञानेश्वरीअध्याय २ रा

💡 ओवी २१४ पासून

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

🌷ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥२१४॥

✏  असा तुझ्या अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून हे सर्व  कौरव आपल्या जीविताची आशा सोडून प्राणावर उदार झाले आहेत.

🌷जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा।तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥२१५॥

✏  ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्यावर मदोन्मत्त  हत्तीला ही प्रलयकाळच ओढवला असे वाटते. त्याप्रमाणे  या कौरवांसही तुझा धाकच वाटतो. 

🌷जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें।तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा॥ २१६ ॥

✏ ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला भितात. तसे अर्जुना, हे कौरव सैन्य तुला भिते.

🌷ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल।जरी मागुता निघसील । न झुंजतचि॥२१७॥

✏ तेव्हा आता जर तू युद्ध न करता मागे फिरशील; तर ही तुझी अपकीर्ती तर होईलच आणि तुझी थोरवी, महतीही नाहीशी होईल मग तुझ्या अंगी हीनत्व प्राप्त  होईल.  

🌷आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती।न गणित कुटी बोलती । आइकतां तुज॥ २१८

✏ बरे ! पळून जाऊ लागलास तर हे तुला जाऊ देणार  नाहीत. तुला धरून तुझी फजिती करतील आणि तुझ्या तोंडावर तुझी निंदा करतील. 

🌷मग ते वेळी हियें फुटावें । आंता लाठेपणे कां न झुंजावे ।हें जिंतले तरी भोगावें । पृथ्वीतल ॥ २१९ ॥

✏ ते मर्मभेदक शब्द ऐकून मग अंतःकरण विदीर्ण  होण्यापेक्षा आत्ताच शौर्याने युद्ध का करू नये? आणि जर तू यांना जिंकलेस तर पृथ्वीचे राज्य भोगशील.

➖➖➖➖👇➖➖➖➖

🌼हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥

अर्थ 👉 मारला गेलास तर स्वर्गाला प्राप्त होशील अथवा जय मिळवलास तर पृथ्वी उपभोगशील. म्हणून हे अर्जुना, निश्चय करून युद्धाला उभा रहा. ॥२-३७॥

➖➖➖➖👆➖➖➖➖

🌷ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित।तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥२२०॥

✏ अथवा ह्या रणांगणावर युद्ध करताना तुझे प्राण खर्ची पडले तर अनायासे सहजच स्वर्गसुख प्राप्त  होईल. 

🌷म्हणोनि ये गोठी।विचारु न करीं किरिटी।आतां धनुष्य घेऊनि उठी।झुंजें वेगीं॥२२१॥

✏ म्हणून अर्जुना, आता विचार करत बसू नकोस, तर ऊठ हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास आरंभ कर.

🌷देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नासे असता। तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥

✏  स्वधर्माचे आचरण केले असता असलेले दोष पातके नष्ट होतात; पण असे असताना ह्या युद्धामुळे  मला पातक लागेल हा समज तुझ्या मनात कसा आला कोण जाणे. 

🌷सांगे प्लवेंचि काय बुडिजे।कां मार्गीं जातां आडळिजे।परी विपायें चालो नेणिजे।तरी तेंही घडे॥२२३||

✏ तूच सांग अर्जुना, नावेचा आधार घेतला तर कोणी बुडेल का? किंवा चांगल्या रस्त्यावर चालताना कोणी ठेच लागून अडखळेल का? हा जर नीट चालता येत नसेल तर होईल ही तसे.

🌷अमृतें तरीचि मरीजे ।जरी विखेंसी सेवीजे।तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे॥२२४॥

✏ दूध प्यायल्याने मरण येणार नाही पण जर दुधात विषाचेही सेवन झाले तर मरण येईल; त्याचप्रमाणे  स्वधर्माचे आचरण केल्यानेही दोष मात्र लागतील, पण मनात  फलकामना धरली असेल तर.

🌷म्हणोनि तुज पार्था ।हेतु सांडोनि सर्वथा।क्षात्रवृत्ती झुंजतां ।पाप नाही २२५॥

✏ म्हणून अर्जुना, फलेच्छा सर्वथा सोडून क्षत्रिय  धर्माने युद्ध कर, म्हणजे पातकाचा लेशही तुला लागणार नाही. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२