सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ||सांख्य योग|| ओवी ३९ ते ५०

अध्याय दुसरा

🔰  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🏺  ||सांख्य योग||

🔰  ओवी३९ ते ५०

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

🌼गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके।हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥

अर्थ 👉 महान योग्यतेच्या गुरूजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचे देखील सेवन करणे श्रेयस्कर आहे. गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग भोगता येतील पण ते कसे सेवन करावेत ? ॥।२-५॥

( अर्जुनाचे पुन्हा युद्ध न करण्यावीषयी कारण सांगणे = पुढे चालू) 

➖➖➖➖⛳➖➖➖➖

☀️देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे।परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये॥ ३९ ॥

✏ देवा, समुद्र गंभीर आहे असे म्हणतात पण तो ही प्रक्षुब्ध झालेला दिसतो. परंतु द्रोणाचार्य प्रक्षुब्ध  झालेले कधी दिसले नाहीत. 

☀️हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।परि अगाध भलें गहन । हृदय यांचे॥ ४० ॥

✏ अहो, आकाशाचा अंत नसला तरीही त्याचे मोजमाप  करता येईल. परंतु द्रोणाचार्यांचे अंतःकरण  इतके विचारपूर्ण आणि सखोल आहे की त्याचे प्रमाण  कोणालाही कळत नाही. 

☀️वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे।परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥ ४१ ॥

✏ कदाचित अमृत आंबेल किंवा काळाच्या ओघात  वज्रही फुटेल पण द्रोणाचार्यांच्या मनात क्रोधादि विकार उत्पन्न होणार नाही. 

☀️स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये।परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ४२ ॥

✏ आईशिवाय इतरांची माया व्यर्थच  ही म्हण खरी असली तरी देवा, यांचे ठिकाणी करुणा मूर्तीमंत वास करत आहे. 

☀️हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे॥ ४३ ॥

✏ द्रोणाचार्य हे जणू दयेचे उगमस्थान आहेत. सर्व  सद्गुणांचा सागर आणि विद्येचे भांडार आहेत.

☀️हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु। आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल॥ ४४ ॥

✏ अशाप्रकारे ते सर्व श्रेष्ठ कृपाळू आहेत, शिवाय  आमच्याविषयी तर ते पूर्ण कृपावंत आहेतच. मग त्यांचा घात करण्याचे माझ्या मनात तरी आणता येईल का? सांग बरे!

☀️ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें। तें मना न ये आघवें । जीवितेंसीं ॥ ४५ ॥

✏ अशांना रणांगणात मारून, मग आपण राज्यसुख  भोगावे हे तर माझ्या अंतःकरणात येवू शकत नाही. 

☀️हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर।ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥

✏ इतके हे कृत्य कठीण आहे, आणि यापेक्षा राज्य  भोग श्रेष्ठ  आहे असे जर कोणी म्हणत असेल तर म्हणोत, मला तर त्या भोगापेक्षा भिक्षा मागणेच बरे वाटते.

☀️ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी॥ ४७ ॥

✏ नाही पेक्षा देशत्याग करून डोंगरदर्‍यात जाऊन रहावे पण यांचे वर (द्रोणाचार्य आणि इतर ) शस्त्रे  धरू नयेत. 

☀️देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं। भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥

✏ देवा नवीन पाळलेल्या तीष्ण(जपून ठेवलेले भात्यातील बाण) बाणांनी यांच्या  मर्मस्थानी प्रहार करून, यांच्या रक्तात बुडालेले ते गलिच्छ भोग आम्ही भोगीत बसावे काय ?

☀️ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती। मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥

✏ यांच्या रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे. म्हणूनच भीष्म - द्रोणाचार्य  यांचेवर बाण टाकण्याचा  सल्ला  (युक्तिवाद) मला मुळीच  पटत नाही. 

☀️ऐसे अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।परि ते मना न येचि मुरारी । आइकोनियां॥ ५० ॥

✏ अर्जुन म्हणतो देवा, मी म्हणालो या गोष्टीचा  आपण चांगला विचार करावा. पण अर्जुनाचे हे बोलणे श्रीकृष्णास आवडले नाही.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२