सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुनविषादयोग ओवी २१६ ते २३२

अध्याय पहिला

🌳  सार्थ ज्ञानेश्वरी ओव्या

🌈  ||अर्जुनविषादयोग 

🌳  ओवी २१६ ते २३२

⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳

➖➖➖➖➖➖➖➖➖

🌈हें मनींचि केवि धरिजे । आपण वज्राचेयां बोलिजे ।वरी घडे तरी कीजे । भले एयां॥ २१६ ॥

✏ आपण अशा स्वतःच्याच कुळाचे भले करावे. त्यांस सुखी करावे, याउलट आपले मन त्यांच्याविषयी वज्रापेक्षा कठीण करण्याचे मनात तरी कसे आणावे? ----- अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला.

🌈आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हे जीवितही उपकारावें । काजीं यांचां ॥ २१७॥

✏ देवा, आम्ही जे जे मिळवावे, त्या सगळ्यांचा आमच्याच कुळाने उपभोग घ्यावा. इतकेच नाही तर  आम्ही आमचा जीवही यांच्यासाठी अर्पण करावा.

🌈आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥ २१८॥  

✏  आम्ही  देशोदेशीचे सर्व राजे जिंकावेत, आणि  आपल्या कुळास आनंदित करावे. 

🌈तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥ २१९॥

✏  पण कर्माची गती कशी विचित्र आहे पहा देवा, तेच हे आमचे गोत्रज आम्हाबरोबरच युद्ध करण्यास तयारीने उभे आहेत यास म्हणावे तरी काय?

🌈अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें। शस्त्राग्रीं जिव्हारें ।आरोपुनी॥२२०॥

✏ अहो, ते आपली मुले, बायका व धन या सर्वांवर पाणी सोडून तलवारीच्या धारेवर आपला जीव ठेवून  आले आहेत.

ऐसियांते कैसेनि मारुं । कवणावरी शस्त्र धरूं।निज हृदया करूं । घातु केवीं ॥ २२१ ॥

✏ तरी देवा, अशा माझ्या ह्रदयाच्या जवळ  असणाऱ्या या माझ्या गोत्रजांचा घात मी कसा करू? कोणावर शस्त्र धरू?

🌼🌸🌼🌸🌹🌼🌸🌼🌸

🌹आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहः । मातुलः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥ ३४॥

अर्थ 👉 माझे गुरु, आजे, पितृतुल्य स्वजन, पुत्र त्याचप्रमाणे आजे, मामे, सासरे, नातु, मेव्हणे आणि तसेच संबंधी लोक - 

🌼🌸🌼🌸🌹🌼🌸🌼🌸

🌈हे नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण।जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत॥२२२॥ 

✏ देवा, हे सगळे कोण आहेत तुला माहीत नाही का ? पलिकडे पहा ते भीष्म आणि द्रोण आहेत. त्यांचे आमच्यावर अनंत असे उपकार आहेत.  

🌈एथ शालक सासरे मातुळ । आणी बंधु कीं हें सकळ। पुत्र नातू केवळ । इष्टही असती॥२२३॥ 

✏ इथे मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच सर्व पुत्र, नातू व आप्तही आहेत. 

🌈अवधारीं अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणोनि दोष आथि वाचे । बोलतांचि॥२२४॥ 

✏ हे सर्व आमचे फार जवळचे नातेवाईक आहेत, तेव्हा यांना मारण्याची नुसती कल्पना केली तरी देखिल पापच आहे.

🌸🌼🌸🌼🌹🌸🌼🌸🌼

🌽एतान्न हन्तुमिछामि घ्नतोऽपि मघुसूदन ।अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं न महीकृते ॥ ३५ ॥

अर्थ 👉 हे मधुसूदना, मी मेलो तरी यांना ठार मारण्याची माझी इच्छा नाही. त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरीही (यांना मारण्याची माझी इच्छा नाही). मग पृथ्वीच्या राज्याची काय कथा ? ॥१-३५॥

🌸🌼🌸🌼🌹🌸🌼🌸🌼

🌈हे वरी भलतें करितु । आंताचि एथें मारितु। परि आपण मनें घातु । न चिंतावा॥२२५॥ 

✏ उलट पक्षी हे वाटेल ते करोत; किंवा ते आत्ताच  आम्हाला इथेच मारोत; तरीपण आपण त्याचा घात करण्याचे मनातही आणू नये.

🌈त्रैलोक्यींचे अनकळित । जरी राज्य होईल एथ । तरी हें अनुचित । नाचरें मी॥२२६॥ 

✏ अहो ! त्रिभुवनाचे राज्य जरी प्राप्त झाले, तरी सुद्धा हे अनुचित कर्म मी करणार नाही, 

🌈जरी आज एथ ऐसें कीजे । तरी कवणांचा मनीं उरिजे । सांग मुख केवीं पाहिजे । तुझे कृष्णा॥२२७॥

✏ कृष्णा ! जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या  वधासारखे हे असले घोर कृत्य केले;  तर कोणाच्या  मनात आमच्याविषयी आदर राहील; आणि देवा,  तुझे तोंड तरी आमच्या दृष्टीस पडेल का?

🌼🌸🌼🌸🌹🌼🌸🌼🌸

🌽निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन|पापनेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः३६॥ 

अर्थ 👉 हे जनार्दना, धृतराष्ट्रपुत्रांना मारून आमचे काय प्रिय होणार ? ह्या आततायींना मारले असता आम्हाला (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल. 

🌸🌼🌸🌼🌹🌸🌼🌸🌼

🌈जरी वधु करूनी गोत्रजांचा । तरी वसौटा होऊन दोषांचा। मज जोडलासि तूं हातींचा । दूरी होसी॥२२८॥ 

✏ जर मी गोत्रजांचा वध केला; तर मी दोषांचे वसतीस्थान होईन. आणि मग अनायासे जोडलेला तू  मात्र माझ्या हातचा निसटून जाशील.

🌈कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें ।तयें वेळी तूं कवण कें । देखावासी॥२२९॥ 

✏ कुलघाताने घडणारी सर्व पातके अंगाशी जोडली की तू दुरावशील तेव्हा तुला कुठे पहावे आम्ही? 

🌈जैसा उद्यानामाजीं अनळु।संचरला देखोनि प्रबळु।मग क्षणभरी कोकिळु । स्थिर नोहे॥२३०॥ 

✏ अहो ! जर एखाद्या बागेत अग्नीचा भडका उडाला तर कोकिळ पक्षी तिथे क्षणभर राहात नाही.

🌈सकर्दम सरोवरु।अवलोकूनि चकोरु। न सेवितु अव्हेरु।करूनि निघे॥२३१॥ 

✏ किंवा  सरोवराचे पाणी आटले, चिखलच शिल्लक  राहिला तर चकोर पक्षी सरोवराचा तिरस्कार करून  निघूनच जातो. 

🌈तयापरी तूं देवा । मज झकों न येसी मावा।जरी पुण्याचा वोलावा। नाशिजेल॥२३२॥ 

✏ त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठायी असलेला पुण्याचा ओलावा या युद्धाने नाहीसा झाला; तर तू तुझ्या मायेने मला फसवून अलगद दूर होशील. 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Scabies Dermatitis | खरुज त्वचाविकार Marathi

ऐकू कमी येते बहिरेपणा Deafness

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ॥अर्जुनविषादयोग॥ ओव्या५१ते६२